PM AASHA Yojana: शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘PM AASHA’ योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी सुमारे ₹35,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून MSP खाली भाव गेल्यास सरकार थेट खरेदी करणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला किमान आधारभाव (MSP) मिळवून देणे. कडधान्ये, तेलबिया आणि इतर पिकांचे बाजारभाव MSP पेक्षा कमी झाल्यास सरकार हस्तक्षेप करून खरेदी करते.
2025-26 पर्यंत 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत या योजनेवर ₹35,000 कोटी खर्च होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होणार असून ग्राहकांनाही स्थिर दरात माल उपलब्ध होणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार, तूर, उडीद आणि मसूर या पिकांच्या खरेदीसाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे. काही पिकांवर खरेदीची मर्यादा शिथिल करण्यात आली असून तुरीची 100% खरेदी करण्यावर भर दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
