Shravanbal Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील 65 वर्षांवरील गरजू नागरिकांसाठी राज्य शासनाची ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना’ मोठा आधार ठरत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना दरमहा ₹600 पेन्शन दिली जाते. ही योजना संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या निधीतून चालते.
या योजनेतून दोन गटांत आर्थिक मदत दिली जाते. ग्रुप Aमध्ये येणाऱ्या बीपीएल कुटुंबातील 65 वर्षांवरील गरजूंना एकूण ₹600 मिळतात, ज्यातील ₹200 केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शनमधून आणि ₹400 राज्य सरकारच्या श्रावणबाळ योजनेंतर्गत दिले जातात. तर ग्रुप Bमध्ये बीपीएल यादित नसलेल्या पण वार्षिक उत्पन्न ₹21,000 पेक्षा कमी असलेल्या लाभार्थ्यांना संपूर्ण ₹600 राज्य सरकारतर्फे दिले जातात.
कोण अर्ज करू शकतो?
अर्जदार किमान 15 वर्षे महाराष्ट्रात राहिलेला कायमस्वरूपी रहिवासी असावा, वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे, कुटुंब बीपीएल यादित असावे किंवा वार्षिक उत्पन्न ₹21,000 पेक्षा कमी असल्यास ही योजना लागू होते.
हेही वाचा : मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत; 1ली ते 10वी साठी ₹2,500 ते ₹5,000 आर्थिक मदत.
अर्ज कसा करावा?
श्रावणबाळ योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत.
ऑनलाइन अर्जासाठी अर्जदाराने Aaple Sarkar (MahaDBT) पोर्टलवर नोंदणी करावी लागते. ईमेल आणि मोबाईल OTP तपासणीनंतर युजरनेम-पासवर्ड तयार करून वैयक्तिक माहिती, पत्ता, ओळखपुरावे आणि फोटो अपलोड करावा लागतो. नंतर पोर्टलवर श्रावणबाळ योजना निवडून अर्ज सादर करता येतो. अर्ज सादर झाल्यानंतर अर्ज आयडी एसएमएस आणि ईमेलवर मिळतो.
तसेच इच्छुक लाभार्थी या योजनेसाठी तलाठी कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्जही करू शकतात. अर्ज फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज तलाठी कार्यालयात सादर करून पावती घ्यावी लागते.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
आधार कार्ड, दोन पासपोर्ट फोटो, वयाचा पुरावा, बीपीएल कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र/डोमिसाईल, बँक खात्याचा तपशील आणि जिल्हा सामाजिक कल्याण कार्यालयाने मागितलेली इतर कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
राज्यातील अनेक गरजू वृद्धांसाठी ही योजना आर्थिक दिलासा देणारी ठरत आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील विधवा महिलांना दरमहा ₹१५०० देणारी योजना, अर्ज करण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक.

