राज्यातील वाढत्या उष्णतेदरम्यान महाराष्ट्र सरकारने वीजदरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वीज विक्रीवरील करात वाढ करण्यात आली असून याचा थेट परिणाम औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर होणार आहे. प्रतियुनिट तब्बल 9.90 पैशांनी कर वाढवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांवर थेट परिणाम होणार नसला, तरी उद्योग आणि व्यवसायांना वाढीव वीजबिलाचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी औद्योगिक ग्राहकांसाठी विक्रीकर 19.04 पैसे प्रति युनिट होता, तो आता 28.94 पैसे करण्यात आला आहे. तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी 18.00 पैशांवरून 27.90 पैसे प्रति युनिट असा वाढीव दर लागू करण्यात आला आहे.
राज्याची ‘औद्योगिक राज्य’ ही ओळख धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वाढत्या वीजदरांमुळे उद्योग अन्य राज्यांकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे मत ऊर्जातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या वाढीव करातून मिळणारा निधी राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला मदत होणार असली, तरी उद्योगांवर आर्थिक ताण वाढणार आहे.
याआधीच ग्रिड सपोर्ट चार्ज आणि इतर नियमांमुळे उद्योगांचे वीजबिल वाढले असताना, आता नव्या करवाढीमुळे उद्योजकांवर आणखी भार पडणार आहे. त्यामुळे उद्योगांचे स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: महाराष्ट्रात मंगळवारपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सेवा ठप्प होण्याची शक्यता.

