स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शाळा प्रवेश उत्सव भव्य, आकर्षक आणि परिणामकारक पद्धतीने राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. नाशिक जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, सुविधा आणि पारदर्शकता यावर विशेष भर दिला.
शाळांमध्ये पालकांचा विश्वास वाढवण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “निपुण महाराष्ट्र” अभियान प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणित कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी नियमित मूल्यमापन आणि सुधारात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
शिक्षकांच्या सेवाविषयक प्रकरणांमध्ये कोणतीही प्रलंबितता राहू नये, यासाठी पदोन्नती, वेतन आणि भविष्य निर्वाह निधी (GPF) प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित स्वच्छतागृहे, स्वच्छ परिसर आणि क्रीडा सुविधा अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शाळांमध्ये दुरुस्ती किंवा सुरक्षिततेची गरज आहे, त्या कामांना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शिक्षण अधिक आधुनिक करण्यासाठी प्रयोगशाळा, क्रीडांगण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) लॅब उभारण्यावर भर देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे नियोजन आहे. “माझी शाळा – माझी जबाबदारी” या संकल्पनेतून समाजाचा सहभाग वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “आनंददायी शनिवार”, स्वसंरक्षण प्रशिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचेही निर्देश देण्यात आले. तसेच एकल पालक आणि अनाथ विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि “धमाल सुट्टी” या पुस्तिकेचेही अनावरण करण्यात आले.
हेही वाचा: अतिउष्णतेला तोंड देण्यासाठी ‘हीट रेसिलियन्स सेंटर’चा शुभारंभ; महाराष्ट्रात शाश्वत शीतकरणावर भर.

