राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ‘AI’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ संदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ऊर्जा विभागाला याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
बैठकीस ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, तसेच Tata Power, Adani Power आणि BESTचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या काळात वीज मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वीजनिर्मिती, वितरण, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे.
ऊर्जा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरेसा कोळसा आणि पाण्याचा साठा उपलब्ध असून वीजनिर्मिती आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. मॉन्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
कोयना जलविद्युत प्रकल्पातून गरजेनुसार 1800 मेगावॅटपर्यंत वीज उत्पादनाची क्षमता उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त वीज खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई आयलँडिंग योजना कार्यरत असून ग्रीडमध्ये बिघाड झाल्यास मुंबईला स्वतंत्रपणे वीजपुरवठा करण्याची क्षमता आहे.
तसेच भिरा पंप्ड स्टोरेज प्रकल्प कार्यरत असून, ब्लॅक स्टार्ट ड्रिल्स आणि SLDC बॅकअप नियंत्रण प्रणालीही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी पूर्ण असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: एज्युसिटी व मेडिसिटी प्रकल्पाला गती; महाराष्ट्रात जागतिक विद्यापीठांचे कॅम्पस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

