लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ आणि माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वैद्यकीय सेवा आणि शिक्षण क्षेत्रात निस्पृहपणे कार्य करणारे एक सेवाव्रती व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले की, डॉ. पाटील यांना आपल्या परिसराच्या विकासाची प्रचंड तळमळ होती. व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असतानाही त्यांनी ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय असून बालरोगतज्ज्ञांच्या संघटनात्मक बळकटीकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचावा यासाठी ते कायम प्रयत्नशील होते.
लातूरमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. या संस्थेअंतर्गत असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात गुणवत्तेची ओळख निर्माण केली. सार्वजनिक जीवनातही त्यांनी सक्रिय भूमिका निभावत भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले. राज्यसभेत त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या विषय समित्यांवर काम करत आपली छाप उमटवली.
त्यांच्या निधनामुळे राज्याने वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व गमावल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाटील कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना करून त्यांनी डॉ. पाटील यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा: नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; चिखलीत जनसंवादात 110 निवेदने.

