नागपूर येथील लोकभवनात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असून पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे राज्याने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
या सौर प्रकल्पाची क्षमता 90 किलोवॅट असून दरवर्षी सुमारे 1,15,200 युनिट्स स्वच्छ वीज निर्मिती होणार आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे, तसेच वीज खर्चातही बचत होणार आहे.
कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी हरित ऊर्जा ही भविष्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. अशा प्रकल्पांमुळे पर्यावरण संवर्धनासोबतच ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन साधता येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूरसारख्या शहरात अशा उपक्रमांमुळे नागरिक आणि संस्थांना नवीकरणीय ऊर्जेकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पात अत्याधुनिक ‘सोलार एज’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक सोलर पॅनेलचे स्वतंत्र निरीक्षण, सावली किंवा बिघाडाचा कमी परिणाम आणि रिअल-टाइम वीज निर्मिती मॉनिटरिंग यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये आहेत.
या प्रकल्पाची अंमलबजावणी मेडाचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या अभियंत्यांनी केली. कार्यक्रमाला डॉ. प्रशांत नारनवरे, रमेश येवले यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: महिला सक्षमीकरण: विकासाचा पाया मजबूत करणाऱ्या सरकारी योजना आणि नवी दिशा.

