राज्यात 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीटीची शक्यता आहे.
19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट भाग, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात वादळी पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि अमरावती विभागातही पावसाचा प्रभाव दिसून येऊ शकतो. 22 एप्रिल रोजी मात्र पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
या संभाव्य हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी हवामानानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत. वादळी वारे, पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच शेतमाल आणि भाजीपाला उघड्यावर ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: शाळांना गणवेश-पुस्तक खरेदीसाठी सक्ती करता येणार नाही; शिक्षण विभागाचा आदेश.

