संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून, पूर्वतयारी आणि समन्वयाच्या माध्यमातून संभाव्य संकटाचे परिणाम कमी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासाठी पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि जुन्या जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनावर विशेष भर देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी, जलसंपदा, वित्त, आपत्ती व्यवस्थापन आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव जास्त जाणवू शकतो आणि सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तसेच उष्णतेच्या लाटा वाढण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आयओडीमुळे या परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१५ च्या अनुभवातून शिकून योग्य नियोजन केल्यास परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल. दोन पावसाच्या सरींमध्ये मोठा खंड पडल्यास पिकांवर ताण येतो, त्यामुळे संरक्षित सिंचन आणि पाणी साठवण क्षमतेत वाढ करणे अत्यावश्यक आहे.
‘जलयुक्त शिवार’ आणि ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ यांसारख्या योजनांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात पाणी व्यवस्थापनासाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.
पर्जन्यमान ९०% पेक्षा कमी राहिल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मनरेगा अंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन निधीचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
पशुधनासाठी चारा टंचाई टाळण्यासाठी वैरण विकास कार्यक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः सोलापूर, सांगली आणि मराठवाडा भागात चाऱ्याच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, खरीप हंगामात नुकसान टाळण्यासाठी खत व बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल. डीएपी खत वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासह कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
शेतकऱ्यांना शेततळे योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. दुबार पेरणीची गरज भासल्यास अतिरिक्त बियाण्यांचीही व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून पाणी बचत, जलसंधारण आणि शेती संरक्षणासाठी सर्वंकष उपाययोजना राबवून संभाव्य एल निनोचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा: मातृसेवा संघाचा 105 वा वर्धापन दिन; महिला-बाल आरोग्य सेवेसाठी सरकारची मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

