मुंबईत आयोजित १५ व्या वार्षिक ‘लीगल इरा इंडियन लीगल अवॉर्ड्स’ समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी देशाच्या प्रगतीमध्ये विधि शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर असताना मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम विधी व्यवस्था हीच विकासाची खरी किल्ली ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
Association of Indian Law Firms आणि Legal Era Media Group यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभात विधि क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक आणि फर्म्सचा गौरव करण्यात आला. या वेळी राज्यपालांनी सांगितले की, करार व्यवस्थापन, वाद निराकरण, उद्योगांना सल्ला आणि हक्कांचे संरक्षण या माध्यमातून विधी क्षेत्र देशाला गुंतवणूक आणि व्यापारासाठी आकर्षक बनवते.
भारताच्या आर्थिक वाढीसोबतच डिजिटल पायाभूत सुविधा आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी ही विधी व्यवस्थेच्या गुणवत्तेवर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या काळात तंत्रज्ञानाधारित कायदा आणि नियामक चौकट लक्षात घेऊन अभ्यासक्रम विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्यपालांनी कायदा क्षेत्रातील संस्थांना आणि विद्यापीठांना सहकार्य वाढवण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या अधिक संधी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून त्यांची रोजगारक्षमता वाढेल आणि सक्षम विधिज्ञ तयार होतील, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल, उज्जल भुयान, तसेच राज्याचे मंत्री आशिष शेलार आणि विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा: हॉटेल मेन्यूत ‘पनीर’ की ‘चीज ॲनालॉग’ स्पष्ट करणे बंधनकारक – मंत्री नरहरी झिरवाळ.

