राज्यात दुधातील भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने आधुनिक यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. National Dairy Development Board आणि Indian Institutes of Technology यांच्या सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत NDDB चे अध्यक्ष मीनेश शाह यांनी राज्यातील दुग्धविकास प्रकल्पांची माहिती सादर केली. सध्या राज्यातील सुमारे ४० टक्के दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया होते, तर उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येत असल्याने भेसळीचा धोका अधिक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत आणण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशभरात ७५ हजार नवीन गावे सहकारी दुग्ध व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याबरोबरच दुधातील भेसळ नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. सध्या विकसित करण्यात आलेली टेस्ट स्ट्रिप यूरिया आणि इतर भेसळ घटक ओळखू शकते, तर पुढील टप्प्यात AI आधारित यंत्रणा अधिक अचूक तपासणीसाठी उपयोगी ठरणार आहे.
NDDB च्या माध्यमातून राज्यात दुग्ध क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे कामही वेगात सुरू आहे. महानंद डेअरीच्या पुनरुज्जीवनाचे सुमारे ७८ टक्के काम पूर्ण झाले असून, ३ लाख लिटर क्षमतेचा नवीन ग्रीनफिल्ड डेअरी प्रकल्प उभारला जात आहे. तसेच मुंबईतील आरे कॉलनीत कंप्रेस्ड बायोगॅस प्रकल्प, उदगीर आणि बुटीबोरी येथे अत्याधुनिक डेअरी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे.
याशिवाय, विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांत दूध संकलन वाढवण्यावर भर देण्यात येत असून, दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे राज्यातील दुग्धव्यवसाय अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि शेतकरी-केंद्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: कुंभमेळा 2027 ‘हायटेक’ होणार! AI चा वापर करून गर्दी नियंत्रण व सुरक्षिततेवर भर.

