महाराष्ट्रातील भारत निवडणूक आयोग यांनी विधानपरिषदेच्या एकूण १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, १२ मे २०२६ रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. यामध्ये नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
या नऊ जागांवरील सदस्यांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या सदस्यांमध्ये नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. तसेच डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार, १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल, तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी सुरू होईल. या निवडणुकीसाठी अधिसूचना २३ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. अर्जांची छाननी २ मे रोजी होईल, तर ४ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे.
हेही वाचा: सोलापूर अल्पवयीन माता प्रकरण: बालहक्क आयोगाचे कडक निर्देश; १ महिन्यात कृती आराखडा सादर करण्याचे आदेश.

