अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र चौंडी येथून ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’चा भव्य शुभारंभ होत जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यात्रा केवळ भौगोलिक नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवास असल्याचे सांगत, देशभर जलजागृतीसाठी ती दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उल्लेख करत जलसंवर्धन, लोककल्याण आणि महिला सक्षमीकरण यामध्ये त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर जलसिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच दुष्काळी भागांना पाणी पोहोचवणे, नद्यांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संवर्धनावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही जलसंवर्धनाच्या वारशाला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करत, या यात्रेमुळे समाजात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला. ‘जलयुक्त शिवार’सारख्या उपक्रमांमुळे हजारो गावे टंचाईमुक्त झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
या जलयात्रेची सुरुवात चौंडी येथून पवित्र माती आणि सीना नदीच्या जलपूजनाने झाली असून कलश घेऊन यात्रा महेश्वरकडे मार्गस्थ झाली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. ही यात्रा नाशिक, सिन्नर, संगमनेर, शिर्डी, संभाजीनगर मार्गे पुढे जात अखेरीस मध्यप्रदेशातील महेश्वर येथे समारोप होणार आहे.
राज्यात जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी ही यात्रा नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा: महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिलला; १.४० लाख डॉक्टर मतदानासाठी सज्ज.

