मुंबई : समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात ‘जिल्हा युवा पुरस्कार’ १ मे महाराष्ट्र दिन निमित्त प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी दिली.
या संदर्भातील जिल्हास्तर युवा पुरस्कार समितीची बैठक मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत विविध समाजोपयोगी कार्य करणाऱ्या युवक-युवती आणि संस्थांच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली.
दुर्बल घटकांसाठी काम, अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी भागातील उपक्रम, झोपडपट्टी सुधारणा, व्यसनमुक्ती, आपत्ती व्यवस्थापन, रोजगार निर्मिती, विज्ञान-तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांतील कार्याचा या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे.
राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उपक्रमांनाही विशेष महत्त्व दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या पुरस्कारांतर्गत युवक-युवतींना प्रत्येकी १० हजार रुपये, तर सामाजिक संस्थांना ५० हजार रुपये, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना प्रेरणा मिळून समाजोपयोगी कार्यात सहभाग वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
हेही वाचा : डिजिटल व एआय आधारित सेवांकडे वाटचाल; नागरिकांना जलद-पारदर्शक सेवा देण्यावर भर – मुख्य सचिव राजेश अग्रवाल.

