महाराष्ट्रावर कर्जाचा मोठा भार असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. राज्याने आतापर्यंत केवळ 18 टक्केच कर्ज उचलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात राज्य सहकारी संघाच्या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, “कर्ज फेडणाऱ्यालाच पुन्हा कर्ज मिळते.” त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांकडून मांडले जाणारे आकडे वास्तवाशी विसंगत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रवीण दरेकर, सुनील कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारने राज्यांना जीएसडीपीच्या 25 टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्याची परवानगी दिली असून महाराष्ट्राने त्यापैकी केवळ 18 टक्केच कर्ज घेतले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
सहकार क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील विद्यापीठांमध्ये सहकार विषयाचा अभाव आहे. पुढील 2 ते 3 महिन्यांत सर्व विद्यापीठांमध्ये सहकार विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच स्वतंत्र सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सहकारी संस्थांसाठी शिक्षण निधी पुन्हा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. राज्य सरकारने यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: महाराष्ट्रात वीज महागली: उद्योग-व्यवसायांवर अतिरिक्त कर; सरकारचा पैसा ‘या’ योजनेसाठी वापरणार.

