राज्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील पनीर पदार्थांबाबत पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार आता प्रत्येक हॉटेल, उपाहारगृह आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या मेन्यूकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर पदार्थात ‘नैसर्गिक पनीर/चीज’ वापरले आहे की ‘चीज ॲनालॉग’, हे स्पष्टपणे नमूद करणे कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे.
पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्याय म्हणून ‘चीज ॲनालॉग’ वापरून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर ही मोहीम २५ मार्च २०२६ पासून राज्यभर राबवली जात आहे. या निर्णयाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांचाही पाठिंबा मिळाला असून केंद्र स्तरावरूनही यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
नव्या नियमांनुसार, जर एखाद्या पदार्थात दूधापासून तयार केलेले पनीर न वापरता वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेला ‘चीज ॲनालॉग’ वापरला असेल, तर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित हॉटेल किंवा विक्रेत्यावर
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. ग्राहकांची फसवणूक केल्यास परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार ग्राहकांना अचूक माहिती देणे बंधनकारक आहे. पनीर हा केवळ दुधापासून तयार होणारा पदार्थ आहे, तर ‘चीज ॲनालॉग’ हा खाद्यतेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून बनवला जातो. दिसायला समान असला तरी त्याची गुणवत्ता व घटक वेगळे असतात.
दरम्यान, प्रशासनाने पुरवठादारांनाही विक्री बिलावर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल संघटनांशी समन्वय साधून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्राहकांनी पदार्थ घेताना दक्षता घ्यावी आणि फसवणूक झाल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

