उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमी रुग्णांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक रुग्णालयात भेट देत उपचार सुरू असलेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली.
मोताळा तालुक्यातील भाविक देवदर्शनासाठी जात असताना 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील नंदगज परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले होते. प्राथमिक उपचारानंतर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाण्यात हलविण्यात आले.
जाधव यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या निर्मलाबाई पाखरे आणि भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच इतर रुग्णांशीही संवाद साधत उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते.
रुग्णालय भेटीनंतर त्यांनी रोहीणखेड येथे अपघातात मृत्यू झालेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमी भानुदास हुंबड आणि नलिनी हुंबड यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
हेही वाचा: कोल्हापूर भूमी अभिलेख ‘हायटेक’; 3.69 कोटींच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे वितरण, मोजणी कामाला वेग.

