राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये येत्या जूनपासून नवीन, काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे शासकीय आयटीआय व तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पार पडले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या संस्थेला शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्यात आले.
नवीन अभ्यासक्रमांत सौर ऊर्जा तंत्रज्ञान, डिजिटल सेवा, सायबर सुरक्षा आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्यांचा समावेश असणार आहे. राज्यात वाढलेल्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या असून त्यानुसार प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे.
कामठी आयटीआयमध्येही नवीन कोर्स सुरू करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली होती. ती मान्य करत मंत्री लोढा यांनी या संस्थेचा दर महिन्याला आढावा घेऊन ती राज्यातील आदर्श प्रशिक्षण संस्था बनवण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण मिळून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ प्रमाणपत्रावर भर न देता प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कामठी आयटीआयच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४.५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आगामी काळात कोराडी परिसर कौशल्य प्रशिक्षण व सामाजिक उत्तरदायित्वाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा: वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धतीचे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वेद पाठशाळेचे उद्घाटन.

