अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे १३ बालविवाह रोखण्यात यश मिळाले असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवशी बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच सतर्कता बाळगली होती. यासाठी राज्यस्तरीय आढावा बैठक घेऊन सर्व जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांना कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते.
राज्यात जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइन 1098, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पथनाट्य, पोस्टर, पदयात्रा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
बालविवाहाचे कायदेशीर परिणामही नागरिकांना समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ वर्षांखाली किंवा मुलाचे वय २१ वर्षांखाली असल्यास विवाह लावणाऱ्या व्यक्तींवर २४ तासांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून रायगड, अहिल्यानगर, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण १३ बालविवाह रोखण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
महिला व बालविकास विभागाच्या समन्वयित कारवाईमुळे बालविवाहासारख्या कुप्रथेविरोधात समाजात ठोस संदेश गेला असून भविष्यातही अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
हेही वाचा: पत्रकारितेत AIचा प्रभाव वाढतोय; महिला पत्रकारांनी तंत्रज्ञान स्वीकारावे – ब्रिजेश सिंह.

