राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी मदत लवकर मिळावी यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे आता रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज नसून थेट संबंधित रुग्णालयामार्फत अर्ज सादर केला जाणार आहे.
या नव्या प्रणालीचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन अर्ज थेट मुख्यमंत्री साहाय्यता निधी कार्यालयाकडे पाठवणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यास अर्जाची मंजुरी केवळ 8 तासांत दिली जाणार आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये रुग्णस्नेही बदल करण्यात आले आहेत. राज्यभरात ही प्रणाली प्रभावीपणे राबविण्याची तयारी सुरू आहे.
कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
गेल्या आर्थिक वर्षात (1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026) राज्यातील 40,776 रुग्णांना एकूण 333 कोटी रुपयांहून अधिक वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. त्यामुळे ही नवी प्रणाली आणखी वेगवान आणि पारदर्शक मदत देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
हेही वाचा: शाळांकडून गणवेश-पुस्तक खरेदीची सक्ती बंद; नियम मोडल्यास कडक कारवाईचा इशारा.

