महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त राज्यात मोठा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात एक हजार महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे उभारण्याची घोषणा केली आहे.
पुणे जिल्ह्यातील खानवडी (ता. पुरंदर) येथे झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या जन्मगावी जिल्हा परिषदेच्या ‘ज्योती-सावित्री’ शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. ही शाळा बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणारी असून CBSE बोर्डाशी संलग्न असलेली राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असल्याची माहिती देण्यात आली.
या शाळेची संकल्पना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असल्याचेही सांगण्यात आले. सध्या येथे सुमारे 260 विद्यार्थी शिक्षण घेत असून भविष्यात 1800 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे राज्यातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: School Bus नियम बदल: RTO ठरवणार भाडे, वार्षिक नाही तर मासिक फी; पालकांना दिलासा.

