नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाला ‘जनता दरबार’ म्हणून पाहावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
मुंबईतील गावदेवी येथे शारदा मंदिर हायस्कूल येथे आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या प्रत्येक कामासाठी ठरलेली कालमर्यादा आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये आलेले अर्ज व निवेदने वेळेत निकाली काढणे अत्यावश्यक आहे. कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, असेही त्यांनी निर्देश दिले.
या शिबिरात विद्यार्थी, महिला, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध दाखल्यांसाठी अर्ज स्वीकारून त्यांची तात्काळ पूर्तता करण्यात आली. तसेच आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
अभियानाच्या प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी या उपक्रमाची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध अधिकाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिले.
‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे तत्काळ निराकरण, डिजिटल सेवांचा वापर वाढविणे आणि ‘सिंगल डे सर्व्हिस’ सुविधा उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. मार्च ते मे दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी अशी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
हेही वाचा: रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या 50 शाखा उभारणार; 100% नोकरी हमीवर भर – मंत्री मंगलप्रभात लोढा.

