राज्यात २० ते २४ एप्रिलदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) यांनी २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान अस्थिर राहणार आहे.
या कालावधीत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागांत गारपीट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि हवामानाच्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने पाहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
विजांचा कडकडाट होत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या जागेत, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या आसपास उभे राहणे टाळावे. मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करावा. निवारा नसेल तर पाय एकत्र करून खाली बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रशासनाची तयारी
ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांना जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. शाळा व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शेतकरी व नागरिकांसाठी विशेष सूचना
शेतकऱ्यांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतीची कामे टाळावीत. बांधकाम कामे तात्पुरती थांबवावीत. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या गर्दीचे आयोजन पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: एल निनोचा इशारा: महाराष्ट्र सज्ज; पाणी नियोजन व जलसंधारणाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश.

