राज्य परिवहन सेवेतील शिस्त आणि प्रवासी सुविधांवर भर देत ज्या ठिकाणी बसथांबे आहेत, तेथे बसेस नियमित थांबल्या पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर विभागात नव्याने दाखल झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसच्या शुभारंभप्रसंगी त्यांनी एसटी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे आवाहन केले.
नागपूरमध्ये जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात बावनकुळे यांच्या हस्ते सात बसेसना हिरवी झेंडी दाखवून प्रातिनिधिक शुभारंभ करण्यात आला. एकूण २४ नवीन बसेस नागपूर विभागात दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
एसटी ही लोकसेवेसाठी निर्माण झालेली व्यवस्था असल्याने चालक आणि वाहकांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे सांगत बावनकुळे यांनी बससेवेचे नियोजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन उमरेड, काटोल, सावनेर आणि रामटेक या भागांमध्ये बससेवा अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही बससेवा मजबूत करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी ड्रॅगन पॅलेस, कोराडी, धापेवाडा यांसारख्या ठिकाणी जोडणी वाढवण्याचे निर्देश दिले. तसेच स्वतंत्र पर्यटन सर्किट विकसित करून वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन आणि जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, पीए प्रणाली आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिममुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. एका रांगेत ३+२ अशी आसन व्यवस्था असून सुमारे ५५ ते ५६ प्रवाशांची क्षमता या बसेसमध्ये आहे.
या नव्या बसेसमुळे नागपूर विभागातील बससेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असून प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

