Sangli News : बदलत्या हवामानामुळे दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी जल व्यवस्थापनावर भर देणे अत्यावश्यक असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” अंतर्गत झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
या पंधरवड्याच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांमध्ये जलप्रबोधनाची चळवळ निर्माण होत असून, पाण्याच्या योग्य नियोजनासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज अधिक अचूक होत असल्याचा उल्लेख करत, यंदा जून-जुलैमध्ये कमी पाऊस आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टीचा अंदाज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर आणि नियोजन आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.
पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. सांगली आणि कोल्हापूरमधील पूर व सांडपाणी व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाने उपसा सिंचन योजनांमध्ये बंद जलवाहिनीद्वारे पाणी वितरण करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाइपलाइन टाकली जाणार आहे त्यांना वार्षिक भाडे दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरी भागात सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यावरही भर दिला जात आहे.
या कार्यक्रमात पीक पद्धतीत बदल, उत्पादनवाढ आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: महाराष्ट्र ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’कडे; – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

