Sanjay Gandhi Niradhar Yojana : राज्यातील विधवा, दिव्यांग आणि निराधारांसाठी महत्त्वाची असलेली ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’ सध्या सुरू असून पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही मदत अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान उत्पन्नाचा आधार देणे हा आहे. पारंपरिक उत्पन्नाचे स्रोत नसलेल्या विधवा महिला, दिव्यांग, अनाथ, परित्यक्ता आणि अत्याचारित महिलांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची मानली जाते.
या योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा थेट ₹1500 जमा केले जातात. 18 ते 65 वर्षे वयोगटातील आणि किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास असणारे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. दिव्यांगांसाठी किमान 40 टक्के अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्ज करताना आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक तसेच आवश्यकतेनुसार मृत्यू दाखला किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते.
या योजनेसाठी इच्छुकांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करावा. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवरूनही ऑनलाइन अर्ज करता येतो.
दरमहा मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे राज्यातील हजारो निराधार नागरिकांना आधार मिळत असून त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास त्यांना मोठी मदत होत आहे.
