PM Shram Yogi Mandhan Yojana: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी झालेल्यांना 60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 निश्चित पेन्शन मिळते.
देशातील मोठा वर्ग हा असंघटित क्षेत्रात काम करतो, ज्यांच्याकडे स्थिर उत्पन्न नसते. त्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक अडचणी निर्माण होतात. हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. लाभ घेण्यासाठी मासिक उत्पन्न ₹15,000 पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच EPFO किंवा ESIC चे सदस्य नसावेत, ही अटही लागू आहे.
पथविक्रेते, रिक्षाचालक, शेतमजूर, बांधकाम कामगार, घरगुती कामगार, मेकॅनिक, कचरा वेचणारे अशा असंघटित क्षेत्रातील अनेक कामगारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
अर्जासाठी आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक आणि ऑटो-डेबिटसाठी संमतीपत्र आवश्यक आहे. नोंदणीसाठी जवळच्या CSC केंद्रावर जाऊ शकता. तसेच LIC, EPFO किंवा ESIC कार्यालयांमार्फतही अर्ज करता येतो.
नियमित थोडी बचत करून भविष्यात निश्चित पेन्शन मिळवण्याची ही योजना असंघटित कामगारांसाठी मोठा आधार ठरत आहे.
