Maharashtra Leopard Attack : महाराष्ट्रात वाढत्या बिबट्या हल्ल्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारने तातडीच्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषतः उसपट्ट्यात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
प्रभावित भागातील शाळा आता 9.30 ते 4 वाजेपर्यंत
बिबट्या हल्ले जास्त असलेल्या भागातील शाळांच्या वेळात बदल करण्यात आला असून, आता शाळा सकाळी 9.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांत अनेक नागरिकांवर बिबट्यांनी हल्ले केले असून, ग्रामीण भागात संताप वाढलेला आहे, काही ठिकाणी रस्ते रोखण्याचे प्रकारही घडले आहेत.
रेस्क्यू सेंटर आणि उपकरणांसाठी निधी
राज्य सरकारने बिबट्यांचे हल्ले वाढलेल्या भागांमध्ये पिंजरे, आवश्यक उपकरणे आणि पकड मोहीम राबवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे.
बैठकीनंतर अजित पवार यांनी सांगितले की, “राज्यात दोन विशेष बिबट्या रेस्क्यू सेंटर उभारण्याची योजना सुरू आहे. पकडलेल्या बिबट्यांना या रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे.”
हेही वाचा: लाडकी बहीण योजना ई-केवायसी पूर्ण करू शकत नसाल, तर ही पद्धत वापरा.

